Friday, April 19, 2024

पुण्यात mpsc विद्यार्थ्यांचे अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन सुरू

- Advertisement -

आज पुण्यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीसाठी एमपीएससी उमेदवारांतर्फे अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन सुरू आहे. पुण्यातील अलका टॉकिज चौकात हे आंदोलन होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेत बदल करण्याचे जाहीर केले आहे. तसेच हे बदल २०२३ पासून लागू होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. मात्र २०२३ ऐवजी २०२५पासून हे बदल लागू करण्याची राज्यभरातील उमेदवारांची मागणी आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलका टॉकीज चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यसेवा परीक्षेतील बदल 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकरही सहभागी झाले आहेत. सध्याचं राज्य सरकार लवकरच या प्रश्नी तोडगा काढेल, असा विश्वास पडळकरांनी व्यक्त केलाय.

आयोगाने बदललेल्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा विरोध नाही परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेची तयारी चार ते पाच वर्षापासून वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी परीक्षा पद्धतीनुसार करत आहेत. नव्या बदलामुळे त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागेल. या नव्या बदलाला आत्मसात करून त्यादृष्टीने तयारी करण्यासाठी पुरेसा वेळही मिळणार नाही. बदललेल्या परीक्षा पद्धतीमुळे तीन-चार वर्षापासून बहुपर्यायी परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार आहे.

MPSC मुख्य परीक्षेतील बदलावर विद्यार्थ्यांनी केल्या शंका उपस्थित 

1. कोणतीही परीक्षा पद्धत ठरवत असताना त्याद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांचा विचार व्हावा. UPSC मधून दरवर्षी IAS, IPS ही धोरणात्मक निर्णय घेणारी पदे भरली जातात तर MPSC राज्यसेवा  मधून साधारण 75 टक्के भरती वर्ग दोन पदांसाठी घेतली जातेय.

2. तसेच उपजिल्हाधिकारी पोलिस उप-अधीक्षक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ही पदं वगळता इतर कोणालाही IAS, IPS होण्याची संधी नाही. त्यातही उपजिल्हाधिकारी आणि पोलिस उपअधीक्षक पदांची भरती एमपीएससीकडून दरवर्षी होत नाही. 

3. सद्यस्थितीत अभ्यासक्रम ठरवताना तो UPSC चा काॉपीपेस्ट केला आहे. तसेच काही शंका असल्यास इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम अंतिम समजला जाईल असं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. मराठी माध्यमात उपलब्ध साहित्य, मराठी आणि इंग्रजी लिहण्याच्या वेगातील फरक या सगळ्या गोष्टी पहाता इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना नैसर्गिक फायदा होणार असल्याचं चित्र आहे. 

4. वैकल्पिक विषयामध्ये टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल विषयामध्ये मार्कचा फरक पडू शकतो. देशातील इतर राज्यसेवांचा विचार करता पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश सोडल्यास इतर राज्यात वैकल्पिक विषय दिसून येत नाही.  mpsc exam

5. अभ्यासक्रम ठरवताना महाराष्ट्राच्या संदर्भात इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, संस्कृती या विषयांचा विशेषत: विचार करण्यात आला नाही. तेलंगाणा, आंध्रप्रदेश सारख्या राज्यात राज्यसंदर्भात मुख्य परीक्षेला वेगळे पेपर आहेत. 

6. सध्याच्या पॅटर्ननुसार क्लासेसची तशी गरज नाही. सध्या बरेच विद्यार्थी गावी, घरी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहून अभ्यास करत आहेत. परंतु नवीन पॅटर्ननुसार क्लास लावणे अपरिहार्य होणार आहे. नवीन पॅटर्ननुसार क्लासेसची फी सध्या दोन ते तीन लाखाच्या घरात आहे. यामुळे ग्रामीण, गरीब विद्यार्थी आपोआप यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. 

7. मुलाखतीमध्ये जास्त मार्क्सचा फरक पडू नये म्हणून जवळपास इतर राज्यामध्ये 50 -100 मार्क्सची मुलाखत घेण्यात येते. आंध्रप्रदेशसारख्या राज्यांनी ग्रामीण मुले मागे पडू नये म्हणून मुलाखतच रद्द केली आहे. तर कर्नाटकसारख्या राज्याने मुलाखतीचे गुण 200 वरुन 25 आणले आहे. असे असताना MPSC ची 275 मार्क्सची मुलाखत घेणं कितपत योग्य ठरेल. 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles